विनायक नरहर भावे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते. महात्मा गांधींनी 1940 मध्ये वैयक्तिक सत्याग्रह पुकारला, त्यावेळी पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी विनोबा भावेंची निवड केली. ब्रिटिश सरकार विरोधी आंदोलनाचे पर्यावसन 1942 मध्ये छोडो भारत आंदोलनात झाले. विनोबा भावे पुढे सर्वोदयी नेते म्हणून प्रसिद्ध झाले.
〉 पूर्ण नाव
विनायक नरहर भावे
〉 टोपण नाव
विनोबा
〉 जन्म
11 सप्टेंबर 1895
गागोदे,पेण.जि.रायगड
【ब्रिटिश भारत】
〉 मृत्यू
15 नोव्हेंबर 1982
पवनार,जि. वर्धा
〉 चळवळ
भारतीय स्वातंत्र्यलढा
भूदान चळवळ
〉 पुरस्कार
भारतरत्न पुरस्कार 【1983 मरणोत्तर】
〉 धर्म
हिंदू
〉 प्रभाव
महात्मा गांधी
〉 वडील
नरहर शंभूराव भावे
〉 आई
रखुमाबाई नरहर भावे
■ जीवन
कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील गागोदे या गावी 11 सप्टेंबर 1895 रोजी विनोबा म्हणजेच विनायक नरहर भावे यांचा जन्म झाला.त्यांच्या आजोबांचे नाव शंभुराव भावे होते.शंभुराव भावे यांचे जन्मगाव वाई. त्यांच्या अनेक पिढ्यांचे वास्तव्य वाई येथे होते. वाईच्या ब्राम्हणशाही या मोहल्ल्यातील कोटेश्वर मंदिर भावे यांच्या मालकीचे असून तेथे शंभुरावांनी अग्निहोत्र स्वीकारून अग्निहोत्र शाळा स्थापली होती विनोबांना आजोबा आणि मातोश्रींपासून धर्मपरायणतेचे संस्कार मिळाले. त्यांचे वडील नरहरी भावे व आई रखुमाबाई.वडील नोकरीच्या निमित्ताने बडोदे येथे गेले. विनोबांचे माध्यमिक आणि उच्च शिक्षण बडोदे येथेच झाले.1916 साली महाविद्यालयीन इंटरची परीक्षा देण्यासाठी ते मुंबईस जाण्यास निघाले; परंतु वाटेतच सुरतेस उतरून वाराणसी येथे रवाना झाले. त्यांना दोन गोष्टींचे आकर्षण होते. एक हिमालय व दुसरे बंगालचे सशस्त्र क्रांतिकारक, वाराणसी येथे हिंदु विश्वविद्यालयातील एका समारंभात महात्मा गांधीचे भाषण झाले. त्याचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. हिमालयातील अध्यात्म आणि बंगालमधील क्रांती यांच्या दोन्ही प्रेरणा महात्मा गांधीच्या उक्तीत आणि व्यक्तिमत्त्वात त्यांना आढळल्या. त्यांनी महात्मा गांधींशी पत्रव्यवहार केला व गांधींची कोचरब आश्रमात 1916 रोजी भेट घेतली आणि तेथेच त्या सत्याग्रहश्रमात नैष्ठिक ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करून जीवनसाधना सुरू केली. ऑक्टोबर 1916 रोजी महात्मा गांधींची एक वर्षांची रजा घेऊन ते वाई येथे प्राज्ञपाठशाळेत वेदान्ताच्या अध्ययनाकरिता उपस्थित झाले. ब्रह्मविद्येची साधना त्यांचा जीवन उद्देश होता
■ सामाजिक व धार्मिक कार्य
वाई येथील प्राज्ञपाठशाळा मंडळाचे संस्थापक व मुख्याध्यापक स्वामी केवलानंद सरस्वती यांच्यापाशी विनोबांनी उपनिषदे, ब्रह्मसूत्र शांकरभाष्य, पांतजलयोगसूत्रे विषयांचे अध्ययन केले. दिनकरशास्त्री कानडे व महादेवशास्त्री दिवेकर हे प्राज्ञपाठशाळेची व्यवस्थापनाची व अन्य प्रकारची कामे पाहत होते. प्रत्येक सोमवार हा या पाठशाळेचा सुट्टीचा म्हणजे अनध्ययनाचा दिवस असे. त्या दिवशी पाठशाळेची अंगमेहनतीची कामे शिक्षक-विद्यार्थी उरकत असत आणि प्रज्ञानंदस्वामींच्या समाधिस्थानाच्या सभागृहात विद्यार्थी व शिक्षक यांच्या शास्त्रार्थ चर्चेकरता साप्ताहिक सभा भरत. चर्चेचे विषय सामाजिक, धार्मिक, तात्त्विक हे असतच; परंतु त्याबरोबर प्रचलित राजकारणाची अनेक बाजूंनी मीमांसाही चालत असे.सशस्त्र क्रांतीच्या तत्त्वज्ञानाचा ते पुरस्कार करीत. विनोबांच्याप्रमाणेच त्यांचेही वक्तृत्व अमोघ होते. अहिंसक क्रांताची वैचारिक भूमिका विनोबा मोठ्या परिणामकारक रीतीने सभांमध्ये मांडीत असत.1917 साली हिवाळ्यात वाई येथे प्लेगची साथ उद्भवली. कृष्णेच्या दक्षिण तीरावर राहुट्या आणि पर्णशाला उभारून त्यांत प्राज्ञपाठशाळेचे विद्यार्थी व शिक्षक जवळजवळ 4 महिने राहिले. वेदान्ताचे व इतर शास्त्रांचे पाठ त्यांतील एका विस्तृत पर्णशालेमध्ये चालत असत. विनोबा पर्णशालेबाहेरच्या कृष्णाकाठच्या आम्रवृक्षाच्या छायेखाली उपनिषदांचे व शांकरभाष्याचे उच्च स्वरात वाचन करीत असत.
विनोबा भावे वाईहून परत अहमदाबादला फेब्रुवारी 1918 मध्ये परतले. 1918 साली एन्फ्ल्यूएंझाची साथ देशभर पसरली. लक्षावधी लोक त्या साथीला बळी पडले. त्यात विनोबांचे आई, वडील आणि धाकटा भाऊ दत्तात्रय हे आजारी पडले. ही गोष्ट महात्मा गांधीना कळल्यावर त्यांनी विनोबांना आईच्या सेवेकरीता बडोद्यास पाठवले. परंतु आई आणि धाकटा भाऊ या रोगाला बळी पडले. वडील बरे झाले. विनोबा सर्वांत ज्येष्ठ पुत्र असल्याने आईचा अंत्यविधी त्यांनीच करणे प्राप्त होते. पुरोहिताकडून अंत्यविधीचा संस्कार करवून घेणे विनोबांना मान्य नव्हते. म्हणून ते स्मशानात गेले नाहीत.त्यांच्या वडिलांनी पद्धतीप्रमाणे अंत्यविधी उरकून घेतला.
1921 साली गांधींचे भक्त शेठ जमनालाल बजाज यांनी साबरमतीच्या सत्याग्रह आश्रमाची शाखा वर्ध्याला काढली. त्या शाखेचे संचालक म्हणून महात्मा गांधीनी विनोबांची रवानगी वर्ध्यास केली. 08 एप्रिल 1921 रोजी विनोबा वर्ध्याला पोहोचले. भूदान चळवळ सोडल्यास वर्ध्याच्या आश्रमातच राहून विनोबांनी तपश्चर्या करीत जीवन घालविले.दिवसातले सात-आठ तास सूत कातणे, विणणे आणि शेतकाम यांमध्ये घालवत असत.तसेच रोज नेमाने शरीरश्रम प्रत्येक माणसाने करावे, असा त्यांचा सिद्धान्त होता.शरीरश्रमनिष्ठा हे त्यांच्या जीवन-तत्त्वज्ञानाप्रमाणे महत्त्वाचे व्रत होते.
शरीरश्रमांबरोबरच त्यांनी मानसिक, आधात्मिक साधनाही प्रखरतेने केली. 1930 व 1932 च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी कारागृहवास भोगला.1940 साली महात्मा गांधीनी स्वराज्याकरिता वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन सुरू केले. त्यात पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली. जवाहरलाल नेहरू हे दुसरे निवडले. आध्यात्मिक साधनेला वाहून घेतलला शत्रुमित्रसमभावी तपस्वी मनुष्य सत्याग्रहाला अत्यंत आवश्यक, म्हणून त्यांनी विनोबांची निवड केली. कारण सत्याग्रह हे शत्रूच्या हृदयपरिवर्तनाचे नैतिक शुद्ध साधन होत, अशी महत्मा गांधीची मूलभूत राजकीय भूमिका होती. उच्चतम आध्यात्मिक जीवनसाधनेस वाहिलेला शत्रुमित्रभाव विसरलेला माणूसच असे हृदय परिवर्तन करू शकतो, अशी गांधींची धारणा होती. 20 ऑक्टोबर 1940 रोजी स्वसंपादित हरिजन साप्ताहिकात गांधींनी आपल्या या शिष्याची ओळख करून दिली आहे.
1932 सालच्या सविनय कायदेभंगाच्या सामुदायिक आंदोलनात विनोबांनी भाग घेतला. त्यांनी धुळे कारागृहामध्ये शिक्षा भोगली.शंभरापेक्षा अधिक सत्याग्रही कैदी आणि इतर गुन्ह्यांसाठी शिक्षा झालेले कैदी प्रवचनांच्या सभेत उपस्थित असत. त्यांमध्ये शेठ जमनालाल बजाज, गुलजारीलाल नंदा,अण्णासाहेब दास्ताने, साने गुरुजी इ.मंडळी उपस्थित असत.
या प्रवचनांचा मुख्य दृष्टिकोन 'गीता ही साक्षात भगवंताची उक्ति होय', असा होता. त्या उक्तीला पूर्ण प्रमाण मानूनच, त्यासंबंधी कसलीही साधकबाधक चर्चा न करताच त्यांनी ती 18 प्रवचने दिली. लो. टिळकांच्या गीतारहस्याचा मुख्य दृष्टिकोन त्यांनी मानलानाही. आद्य शंकराचार्याचाच मुख्य दृष्टिकोन मान्य केला.मोहनिरास म्हणजे अज्ञाननाश हे गीतेचे मुख्य उद्दिष्ट त्यांनी मानले.अर्जुनाला युद्धास प्रवृत्त करणे हा उद्देश गृहीत धरून केलेला कर्मयोगाचाच उपदेश गीतेत आहे, हा टिळकांचा दृष्टिकोन विनोबांनी स्वीकारली नाही. विनोबांनी निष्काम कर्मयोग मान्य केला; परंतु युद्धोपदेशाकडे कानाडोळा केला. महात्मा गांधींच्या मताने गीतेमध्ये युद्धाचा आदेश हा भौतिक सशस्त्र युद्धाचा आदेश नाही. मानवी हृदयात चाललेल्या सद्भावना व असद्भावना यांच्या संघर्षाला काव्यमय बनवण्साठी योजलेले मानवी सशस्त्र युद्धाचे कविकल्पित रूपक गीतेने योजिलेले आहे; महाभारत हा इतिहासग्रंथ नाही म्हणून त्यातील योद्धे आणि युद्धात गुंतलेले शत्रुमित्रपक्ष हे केवळ कविकल्पित होत, असे महत्मा गांधी अनासक्ति योग या पुस्तकात प्रतिपादितात. विनोबा आणि गांधी हे दोघेही निरपवाद अहिंसा तत्त्वाचे पुरस्कर्ते. भगवद्गीता वाचत असताना विनोबा भगवद्गीता हा युद्धोपदेश नाही असे सांगतात आणि महत्मा गांधी ते आध्यात्मिक भावनांचे युद्ध होय, असे सांगतात. हा युद्धाचा मुद्दा सोडला, तर सगळ्या एकेश्वरवादी धार्मिकांना प्रेरणा देणारे अत्युच्च जीवनविषयक व विश्वविषयक तत्त्वज्ञान अतिशय सुंदर रीतीने गीतेमध्ये सांगितले असल्यामुळे गीता हा हिंदूंनाच नव्हे तर जगातील अध्यात्मवाद्यांना मोहून टाकणारा ग्रंथ आहे, यात शंका नाही.
वैयक्तिक सत्याग्रहानंतर मार्च 1951 पर्यंत पवनार येथील परंधाम आश्रमातच विनोबांनी शारीरिक आणि मानसिक तपश्चर्येत जीवन व्यतीत केले. 1936 पासून म.गांधी साबरमतीचा आश्रम सोडून सेवाग्रामला म्हणजे पवनारजवळच येऊन राहिले.त्यामुळे गांधी आणि विनोबा यांचा चिरकाल संवाद चालू राहिला. गांधीच्या देहान्तानंतर सर्वसेवासंघ व सर्वोदय समाज या संस्थांची स्थापना झाली. मार्च 1948 मध्ये विनोबा दिल्ली येथे जवाहरलाल नेहरू यांच्या विनंतीवरून गेले. भारत-पाक फाळणी झाल्यानंतर परागंदा झालेले लक्षावधी शरणार्थी दिल्ली, पंजाब, राजस्थानमध्ये आले होते त्यांना धीर देण्याकरता विनोबांना पंडितजींनी बोलावून घेतले. या दौऱ्यात सर्वधर्मसमभावाचा आदेश देऊन प्रेम आणि सद्भावना निर्माण करण्याचा प्रयत्न विनोबांनी केला.
■ निधन
15 नोव्हेंबर 1982 रोजी पवनार येथे परंधाम आश्रमात सतत सात दिवस प्रायोपवेशन करून भूदाननेते आचार्य विनोबा भावे यांनी वयाच्या 87 व्या वर्षी प्राणत्याग केला. त्यांच्या निधनाची वार्ता त्यांनी प्रायोपवेशन सुरू केल्यानंतर केव्हाही अपेक्षित होती. 05 नोव्हेंबर रोजी विनोबांना ताप आला, त्याबरोबरच हृदयविकारही उद्भवला आणि प्रकृती चिंताजनक झाली. उपचार त्वरित सुरू झाले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात उपचार करण्याकरता नेण्याचा विचार तज्ज्ञ डॉक्टरांनी विनोबांना सांगितला; परंतु त्यांनी परंधाम आश्रम सोडण्यास नकार दिला व तेथेच उपचार सुरू झाले. हळूहळू प्रकृती सुधारेल अशी आशा उत्पन्न झाली. अॅलोपथीचे उपचारही विनोबांनी स्वीकारले, परंतु 08 नोव्हेंबर रोजी रात्री अन्नपाणी आणि औषधे या तिन्ही गोष्टी घेण्यास त्यांनी नकार दिला. आचार्यांचे बंधू शिवाजीराव भावे, मित्र दादा धर्माधिकारी इत्यादी मंडळींनी व आश्रमस्थ भक्तजनांनी आचार्यांना परोपरीने काकुळतीस येऊन, अन्नपाणी व औषधे घेण्याची विनंती केली. ती त्यांनी नाकारली. इंदिरा गांधी विनोबाजींना 10 नोव्हेंबर रोजी भेटल्या. अन्नपाणी, औषधे घेण्याची विनंती त्यांनीही केली. प्रायोपवेशनाचा संकल्प करण्याचे कारण आचार्यांनी श्री. त्र्यं. गो. देशमुख व इतर भक्तांना स्पष्ट करून सांगितले. ते म्हणाले- " आता देह आत्म्याला साथ देत नाही. रखडत जगण्यात अर्थ नाही. जराजर्जर शरीर टाकणेच ठीक.त्यामुळे 15 नोव्हेंबर 1982 रोजी आचार्य विनोबा भावे यांचे निधन झाले.
■ विनोबांचे विचार
● वर्तमानाला बंधन असावे म्हणजे वृत्ति मोकळी राहते.
● सत्य, संयम, सेवा ही पारमार्थिक जीवनाची त्रिसूत्री आहे.
● आध्यात्मिक व्यवहार म्हणजे स्वाभाविक व्यवहार म्हणजे शुद्ध व्यवहार.
● हिंदुधर्माचे स्वरूप : आचार-सहिष्णुता, विचारस्वातंत्र्य, नीति- धर्माविषयी दृढता.
● प्राप्तांची सेवा, संतांची सेवा, द्वेष कर्त्याची सेवा ही सर्वोत्तम सेवा.
● असत्यात शक्ति नाही. आपल्या अस्तित्वासाठी ही त्याला सत्याचा आश्रय घेणे भाग आहे.
● सत्य, संयम, सेवा ही पारमार्थिक जीवनाची त्रिसूत्री आहे.
●ईश्वर, गुरू, आत्मा, धर्म, आणि संत ही पाच पूजास्थाने.
●इतिहास म्हणजे अनदिकालापासून आत्तापर्यंतचे सर्व जीवन. पुराण म्हणजे अनदिकालापासून आत्तापर्यंत टिकलेला अनुभवाचा अमर अंश.
आचार्य विनोबा भावे यांच्या विषयीची ही माहिती आपणांस कशी वाटली तसेच काही चुका अथवा सुधारणा असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा?
वरील माहिती आपण पहा आणि आवडल्यास इतरांना ही नक्की Share करा.
धन्यवाद...!!






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!